पेन्शन सुधारणेसह विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
कोल्हापूर : गेल्या ३३ वर्षापासून बँक कर्मचाऱ्यांच्या पेन्शन करानुसार मासिक पेन्शनमध्ये सुधारणा झालेली नाही. या आणि अशा अनेक मागण्यांकरिता अखिल भारतीय निवृत्त बँक कर्मचारी संघटनेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आणि याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांना देण्यात आले.अनेक सेवानिवृत्त कर्मचारी यांना मिळणारा निवृत्ती वेतन अतिशय तुटपुंजा आहे. इतर अनेक संस्थांमध्ये मात्र त्यांना त्यांच्या नवीन वेतन आयोगाच्या पगार वाढीनुसार आपोआप पेन्शन वाढ मिळते आहे. मात्र निवृत्त बँक कर्मचारी व अधिकारी यांना तशी वाढ मिळत नाही. या महत्वाच्या मुद्द्याकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. आज सर्व राष्ट्रीयकृत बँका सरकारला वर्षाला २.०० लाख कोटी रुपये फायदा देत आहेत.
देशभरात साडेतीन लाखांपेक्षा जास्त कर्मचारी संघटनेची निगडित आहेत.
तरीही सरकार या सेवा निवृत्तांच्या मागणीकडे लक्ष देत नाही. तसेच बँक सेवानिवृत्तांच्या अनेक न्याय मागण्या व प्रश्न प्रलंबित आहेत.
यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी स्वीकारलेल्या सूत्रानुसार पेन्शनचे अपडेशन करणे.
सन २०१२ पासून निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विशेष भत्त्याच्या आधारे मूळ पेन्शनची गणना करणे.निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप आरोग्य विमा पॉलिसींवरील जीएसटी माफ करणे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) च्या अधिपत्याखाली निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च स्तरावरील तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करणे.
खाजगी क्षेत्रातील बँकांच्या पेन्शनधारकांना ‘एक्स-ग्रेशिया’ देयक अदा करणे.किमान पेन्शन दरमहा रु.१०,००० निश्चित करणे.
पेन्शन योजनेत समाविष्ट न झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजूर करणे. याबाबत द्विपक्षीय चर्चा झालीच पाहिजे, पेन्शन वाढ मिळालीच पाहिजे, वैद्यकीय विमा मोफत द्या. अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी राज्य समिती (AIBRF) महाराष्ट्र चे अध्यक्ष भास्कर भावे,सरचिटणीस दिनार कवीश्वर,केंद्रीय कार्यकारीणी सदस्य एकनाथ कांबळे,राजन नेरुळकर , अखिल भारतीय निवृत्त बँक कर्मचारी संघटना जिल्हा समन्वय समिती (AIBRF) कोल्हापूरचे सदस्य विलास राजमाने,मकरंद करंदीकर,प्रतापराव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने सेवानिवृत्त बँक कर्मचारी उपस्थित होते.





