ग्रामीण भागालाही शहरांप्रमाणेच २५ दिवसांत गॅस सिलेंडर द्यावेत : खासदार धैर्यशील माने यांची मागणी
कोल्हापूर ता .१ : देशातील एलपीजी गॅस वितरणातील असमानतेकडे लक्ष वेधत ग्रामीण भागातील नागरिकांना शहरांप्रमाणेच २५ दिवसांच्या कालावधीत गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी संसदेच्या अधिवेशनात केली. या संदर्भात त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडेही लक्ष वेधले.
यावेळी खासदार माने म्हणाले, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने परिस्थिती प्रभावीपणे हाताळली आहे. मात्र, सध्या राज्यात शहरांसाठी २५ दिवसांचा आणि ग्रामीण भागासाठी ४५ दिवसांचा सिलेंडर वितरणाचा स्लॅब ठेवण्यात आला असून यामुळे ग्रामीण भागात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
शहरालगत असलेली अनेक गावे केवळ नावापुरती ग्रामीण असली, तरी त्यांच्या गरजा शहरी भागासारख्याच आहेत. त्यामुळे ग्रामीण व शहरी असा भेद न करता सर्वांना समान निकष लागू करावेत, तसेच शहरांप्रमाणेच ग्रामीण भागालाही २५ दिवसांत सिलेंडर मिळण्याची सुविधा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय, पूर्वी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलेल्या बायोगॅस योजनांकडेही त्यांनी लक्ष वेधले. सध्या या योजनेवरील अनुदान बंद झाल्याने त्याचा विस्तार थांबला आहे. कोल्हापूर जिल्हा बायोगॅस प्रकल्पांमध्ये देशात आघाडीवर राहिला असून या योजनांना पुन्हा चालना दिल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच इथेनॉल गॅस निर्मिती व वापर याला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त करत, उस उत्पादक शेतकऱ्यांना याचा थेट लाभ होऊ शकतो, असेही माने यांनी नमूद केले. सरकारने ग्रामीण व शहरी भागामध्ये भेदभाव न करता समान न्याय देण्याच्या दृष्टीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.





