जिल्ह्यात 20 मार्चपर्यंत बंदी आदेश लागू
कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारची आंदोलने करण्यात येत असून विविध पक्षाकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात 8 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 20 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, यात्रा, सण , प्रेतयात्रा आदींना लागू असणार नाही.





