डॉ. संजय डी. पाटील, भरत लाटकर यांचा गौरव
शिव महोत्सवात खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
कोल्हापूर :
समाजात अजूनही चांगुलपणा शिल्लक आहे त्याचा शोध घेऊन त्याच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याची आज नितांत गरज आहे असे प्रतिपादन सरोज एन. पाटील यांनी येथे केले.
शिवाजी विद्यापीठअंतर्गत आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीतर्फे झालेल्या शिव महोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना शिवगौरव, तर भरत लाटकर यांना शिवसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राजमाता जिजाऊसाहेब बहुद्देशीय सभागृहात कार्यक्रम झाला.
सरोज पाटील म्हणाल्या, ‘समाजातील चांगल्या मूल्यांचा शोध घेऊन त्यांची जोपासना करण्याची गरज आज अधिक अधोरेखित होत आहे. भोंदूबाबांच्या मागे लागण्यापेक्षा समाजकारणात योगदान देणे आवश्यक आहे. आज आभासी जगाचा वेढा वाढत असून, मुले व्यसनाधीन होत आहेत. मोबाईलचा अतिरेक टाळावा.
लाटकर यांनी राष्ट्रसेवा दलाच्या कार्यातून देशसेवेची प्रेरणा मिळते. त्यामुळे आजच्या तरुणाईने एक तास देशासाठी द्यावा, असे आवाहन केले.
यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील २० जणांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. कृती समितीचे अध्यक्ष मंजित माने यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे, उत्कर्ष शिंदे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, नगरसेवक राजेश लाटकर, नगरसेवक आदिल फरास, प्रा. रघुनाथ ढमकले, पर्यटन विभागाचे उपसचिव विजय पोवार, सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. सरदार जाधव, डॉ. प्रवीण कोडोलीकर, योगिता कोडोलीकर, विश्वजित वाडकर, नीतेश गणेशाचार्य, अक्षय मोरे, डॉ. कपिल राजहंस उपस्थित होते. उपाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी स्वागत केले. सत्यजित कोसंबी यांनी सूत्रसंचालन केले. सागर बगाडे यांनी प्रास्ताविक केले.





