कौटुंबिक न्यायालय म्हणजे विस्थापित कुटुंबाला जोडणारा दुवा – न्यायाधीश अपर्णा वाईकर
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : शुल्लक कारणावरून घटस्फोट घेण्याचे प्रमाण हल्ली अधिक वाढत आहे. यामध्ये पती – पत्नीने सामंजस्याने वागणे आवश्यक आहे. कौटुंबिक न्यायालय हे विस्थापित कुटुंबाला जोडण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून काम करते. खऱ्या अर्थाने ते दुवा आहे असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश अपर्णा वाईकर यांनी केले.
कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, कौटुंबिक न्यायालय बार असोशिएशन आणि कौटुंबिक न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावा वर्धापन दिन सोहळा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर तांबे एस.एस जिल्हा न्यायाधीश – 4 तथा सदस्य कौटुंबिक न्यायालय सल्लागार समिती, बार असोसिएशन अध्यक्ष व्ही आर पाटील, कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशन अध्यक्ष आर . व्ही पाटील आदी उपस्थित होते.
श्रीमती वाईकर म्हणाल्या, पती – पत्नी परस्परांवरील आदरभाव – प्रेम वाढावे. कोर्टाची पायरी चढण्या अगोदर त्यांनी परस्परांशी संवाद साधावा.तर भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्थेचे अधिक महत्त्व असल्याचे प्रतिपादन तांबे एस.एस जिल्हा न्यायाधीश – 4 यांनी केले. बार असो. अध्यक्ष व्ही आर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले .
यावेळी पती – पत्नीमध्ये म्हणजेच पर्यायाने कुटुंबामध्ये न्यायाची व सलोख्याची भावना दृढ करण्यासाठी कार्यरत असलेल्या विधिज्ञांचा तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून पुन्हा संसारवेल फुललेल्या-बहरलेल्या अशा प्रत्येकी 7 दांपत्याचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प (रोप), स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी काही दापत्यांनी तसेच विधिज्ञांनी आपले समयोचित विचार व्यक्त केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक ओंकार तुळसुलकर, सूत्रसंचालन विनोद भिलारे तर आभार प्रदर्शन कौटुंबिक न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक महेश पाटील यांनी केले .
याप्रसंगी नव्या समुपदेशन कक्षाचे उद्घाटन न्यायाधीश तांबे एस .एस व न्यायाधीश श्रीमती अपर्णा वाईकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी इतर विभागाचे न्यायाधीश, तसेच विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





