रायगडचा दर्जा काढून घेतल्यास त्याला पुरातत्व विभागच कारणीभूत माजी खासदार संभाजीराजे यांचा इशारा

Spread the news

 

­

 

 

  •  

रायगडचा दर्जा काढून घेतल्यास त्याला पुरातत्व विभागच कारणीभूत

माजी खासदार संभाजीराजे यांचा इशारा

कोल्हापूर

राज्यातील किल्ल्यांना दिलेला जागतीक वारसा स्थळांचा दर्जा  अनाधिकृत बांधकामामुळे भविष्यात काढून घेतला तर त्याला पुरातत्त्व विभागच जबाबदार असेल असा इशारा माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिला. त्यांनी  दिल्ली येथे भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेतली. दुर्गराज रायगडवर सुरू असलेल्या विविध संवर्धन कामांबाबत यावेळी विस्तृत चर्चा झाली. त्याचबरोबर गडावरील अनधिकृत व्यावसायिक बांधकाम व अतिक्रमण यांबाबतही त्यांना माहितीसह सविस्तर निवेदन दिले.

रोपवे कंपनीकडून गडावर अनधिकृत व्यावसायिक बांधकामे करण्यात आली आहेत. रायगड विकास प्राधिकरणाने या बांधकामांबाबत पुरातत्त्व विभागाकडे वेळोवेळी आक्षेप नोंदवला आहे. बांधकाम सुरू असताना पुरातत्त्व विभागाने काम थांबवण्याची नोटीस देऊनही ती डावलून काम पूर्ण केले गेले आहे. असे असताना या कंपनीवर कायदेशीर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न संभाजीराजे यांनी यावेळी उपस्थित केला. यास पुरातत्व विभागाचे महासंचालक व इतर अधिकारी वर्ग कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत, असे संभाजीराजे यांनी प्रतिपादन केले आहे.

अशा प्रकारच्या आधुनिक व अनधिकृत बांधकामामुळे नुकताच रायगडास मिळालेला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा धोक्यात येऊ शकतो, या संभाजीराजे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयास महासंचालक सिंह यांनी सहमती दर्शवत केवळ रायगडच नव्हे तर इतर अकरा गडांचाही दर्जा काढला जाऊ शकतो, असा धोकाही व्यक्त केला आहे. भविष्यात अशी अपमानास्पद वेळ आली तर त्यास पूर्णत: रोपवे कंपनी, तिला पाठीशी घालणारे लोक आणि डोळेझाक करणारा पुरातत्व विभाग जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.

या बैठकीस भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांचेसह भीमा अजमेरा (संचालक, संवर्धन), सुंदर पॉल (संचालक, संवर्धन) व ए एम व्ही सुब्रह्मण्यम (संचालक, स्मारके) हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!