*जाणीवपूर्वक गांधी मैदाना पाणी तुंबवून नुकसान करून जनतेत संभ्रम पसरविणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंद करावा : शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मागणी*
कोल्हापूर दि.२७ : गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा अशा पद्धतीने निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.झाडे यांची भेट घेवून सादर केले.
कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असणारे गांधी मैदान ही संपूर्ण कोल्हापूर वासीयांची अस्मिता आहे. सदर मैदानावर शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसरातील खेळाडू सराव करतात. या मैदानात पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी साचण्याचा प्रकार होत होता. परिसरातील मोठी गटर लाईन या मैदानातून जात असल्याने गांधी मैदानात साचणाऱ्या पाण्यास प्रमुख कारणीभूत आहे. यावर उपाययोजना म्हणून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पहिल्या टप्प्यातील रु.४ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे. यातून गांधी मैदानात साचणारे ड्रेनेजचे पाणी नव्याने ड्रेनेज लाईन टाकून इतर मार्गाने वळविण्याचे काम सुरु आहे. परंतु, गेले काही दिवस या मैदानात असणारी साठणाऱ्या पाण्याचा निचरा करणारी मूळ ड्रेनेज/ गटरची लाईन जाणूनबुजून बंद करण्याचा विकृत प्रकार या परिसरातील काही समाजकंटकाकडून केला जात आहे. यामुळे गांधी मैदानात पुन्हा पाणी साचून मैदानाचे नुकसान करण्याचा डाव आखला जात आहे. गांधी मैदानातील साचलेल्या पाण्याचा निचरा सफाई करताना कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांनाही सदर पाण्याचा मार्ग गाद्या, उशा, सिमेंट पोती टाकून पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा बुजविण्याचा प्रकार मुद्दामहून केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबधित प्रशासनाने आपणांकडे तक्रार दाखल केली आहे. परंतु, अद्यापही सदर प्रकार थांबलेले नसून, गांधी मैदानाचा वापर निव्वळ राजकारण आणि बदनामीच्या हेतूनेच केला जात आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून बदनामीकारक पोस्ट केल्या जात आहेत. निव्वळ स्टंटबाजीसाठी आंदोलने केली जात आहेत. यातून जनतेमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधी मैदानाबाबत सातत्याने घडणाऱ्या या घटनेमुळे हजारो खेळांडूचे नुकसान होत असून, शासकीय मालमत्तेचेही नुकसान होत आहे. तसेच शहरात अशांतता व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये शकुनीमामा असणाऱ्या टोळी प्रमुखावर आणि टोळीवर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे गांधी मैदान मुद्दामहून तुंबविण्याचा प्रकार करणाऱ्या, जाणीवपूर्वक गांधी मैदानाचे नुकसान करून जनतेत अपप्रचार करणाऱ्या टोळक्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करावी. अन्यथा शिवसेना या टोळक्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देईल, असा इशारा आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला.
यावेळी शिवसेना महानगरसमन्वयक कमलाकर जगदाळे, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहर समन्वयक सुनील जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, राहुल चव्हाण, दीपक चव्हाण, उदय भोसले, दुर्गेश लिंग्रस, सुनील खोत, उपशहरप्रमुख सनी अतिग्रे, टिंकू देशपांडे, सुरेश माने, सचिन भोळे, श्रीकांत मंडलिक, मंदार तपकिरे, अर्जुन आंबी, सचिन क्षीरसागर, बाळासाहेब शेलार आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.