- *सरत्या वर्षात १५ लाख भाविकांनी घेतला श्री महालक्ष्मी अन्नछत्राचा लाभ….*
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून असंख्य भाविक कोल्हापूर मध्ये येतात. अलीकडे वर्षभर भाविकांची याठिकाणी गर्दी असते. या भाविकांना गेली १८ वर्षे श्री महालक्ष्मी अन्नछत्र येथे मोफत भोजनप्रसाद देण्याचे कार्य निरंतर सुरु आहे. म्हणूनच देवीचे दर्शन घेतल्यानंतर या सर्व भाविकांची पाऊले आपोआपच मोफत भोजनप्रसाद घेण्यासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्राकडे वळतात. सरत्या वर्षात भाविकांनी या अन्नछत्राला प्रचंड प्रतिसाद दिला. २०२५ सालामध्ये सुमारे १५ लाख भाविकांनी श्री महालक्ष्मी अन्नछत्रात मोफत भोजनप्रसादाचा लाभ घेतला. प्रचंड गर्दी असूनही सर्व भाविकांना सात्विक आणि चविष्ट भोजनप्रसाद मिळाल्यामुळे भाविकांनी खूप समाधान व्यक्त केले. याबरोबरच श्री महालक्ष्मी धर्मशाळेत भाविकांची अल्पदरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या वर्षात सुमारे २ लाख भाविकांची राहण्याची व्यवस्था श्री महालक्ष्मी धर्मशाळेत करण्यात आली. सर्व आधुनिक सोयीसुविधा असूनही कमी दरात राहण्याची उत्तम व्यवस्था झाल्यामुळे भाविक समाधानाने घरी परतले. श्री महालक्ष्मी अन्नछत्र आणि श्री महालक्ष्मी धर्मशाळेचे अध्यक्ष श्री. राजू मेवेकरी यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व यंत्रणा कार्यरत होती. या कामी संजय जोशी, राजेश सुगंधी, ऍड. तन्मय मेवेकरी, प्रशांत तहसीलदार, चंद्रशेखर घोरपडे, विराज कुलकर्णी, आदित्य मेवेकरी, सुनील खडके, प्रतीक गुरव, रजत जोशी, अतिश जाधव, ऋतुराज सरनोबत या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर ७५ कर्मचारी कार्यरत होते.त्यामुळेच एवढी गर्दी असून देखील भाविकांची उत्तम व्यवस्था झाली. कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी या बाबी खूप महत्वाच्या ठरत आहेत.