दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ — महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा उपक्रम
कोल्हापूर, ता. ०२ : कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर म्हणून सौ. रुपाराणी निकम यांची नुकतीच निवड झाली आहे. महापौरपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उपक्रमाची सुरुवात गुरुवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकातून करण्यात येणार आहे. या जनता दरबारामध्ये महापौर म्हणून सौ. रुपाराणी निकम नागरिकांच्या तक्रारी व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेणार आहेत. यावेळी आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी शहरातील नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात संबंधित कागदपत्रांसह या दिवशी सादर कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहभागातून शहरातील प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावण्याचा महापौरांचा मानस आहे.





