निसर्ग शेती आणि रानभाज्यांचे संवर्धन आवश्यक: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
कोल्हापूर /प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक संपत्तीने समृद्ध आहे.येथील जैवविविधता पर्यावरणाच्या दृष्टीने तर उपयुक्त आहेच. मात्र, मानवी जीवनालाही निरोगी बनविण्याचे सामर्थ्य त्यात आहे. जिल्ह्यातील पर्यावरण स्थितीचा विचार केल्यास अनेक प्रकारच्या रानभाज्या उगवण्यास येथील हवामान फार पोषक आहे. मानवी आरोग्याला ज्या सकस अन्नाची गरज लागते, ते अन्नघटक पुरविण्याची क्षमता येथील रानभाज्यांमध्ये आहे. त्यामुळे मानवाला होणारे आजार विकार कमी होतील. अश्या या रानभाज्या व निसर्ग शेतीचा प्रचार- प्रसार होणे आवश्यक आहे. यासाठी यांचे संवर्धन केले पाहिजे. यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
एनजीओ कंपॅशन २४,कोल्हापूर वुई केअर, निसर्ग अंकुर संस्था, इकोस्वास्थ आणि किर्लोस्कर आईल इंजिन्स यांच्यावतीने दोन दिवसीय रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादनाचे प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे, त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात, जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी,पौष्टिक व औषधी अशा रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन, त्यांचा वापर आहारात करावा,निसर्गप्रेमींंनी या रानभाज्या आपल्या परसबागेत लावाव्यात, तसेच शेतकऱ्यांनी महत्वाच्या दुर्मिळ रानभाज्यांची शेतात लागवड करुन त्यांचे फायदे मिळावेत याकरिता २०० हुन अधिक रानभाज्यांचे आणि सेंद्रिय उत्पादनांचे माहितीपूर्ण प्रदर्शन शनिवारी आणि रविवारी ४ आणि ५ ऑक्टोंबर २०२५ रोजी श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, साईक्स एक्सटेंशन टाकाळा, कोल्हापूर येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. असा उद्देश एनजीओ कंपेंशन २४ आणि कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी विषद केला.
यावेळी विभागीय कृषी केंद्र सहसंचालक बसवराज मास्तोळी, शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा.डॉ. ज्योती जाधव, यांनी मनोगत व्यक्त केले.
निसर्ग वनस्पती विविधतेने अत्यंत समृद्ध आहे.पुरातन काळापासून,पारंपारिकपणे अनेक रानभाज्या आवडीने शिजविल्या व खाल्ल्या जातात.निसर्गात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या गारंबीची ४ फुटी शेंग ,टेटूची तलवारीसारखी २ फुटी शेंग, खाजकुहीलीचे , वेल,शेरणी ,चन्नीचे वेल, सोनार वेल, कांड्याचित्रक,गाजरीची भाजी, खरशिंग शेंगा, कडवी,अमरकंद, नळीची भाजी,समुद्रशोक, दगडावर वाढणारा जैताळू, खडक अंबाडी, गिरजाला, सागरी किनाऱ्यावर वाढणारी समुद्रीय घोळ ,समुद्र शिंगी अशा कधीही सहज न बघायला मिळणाऱ्या रानभाज्या आपल्याला येथे बघता येतील.रुकाळू (वृक्षांवर उगवणारा अळू ), तीनतोंडी , मांजरी, बाफेली, सफेद मुसळी,कडवी, कोळयाचो माड अशा अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या रानभाज्या तसेच करटोली, दिंडा, कुडा,आंबुशी, पाथरी,कुरडू ,बांबू कोंब ,रानगवर, केना,पानांचा ओवा, कपाळफोडी, चिवळ, आघाडा, काटेमाठ, जिवंती,अंबाडा, सुरण , टाकळा ,मटारू, भुई आवळी,भारंगी या औषधी गुणांनीयुक्त आरोग्यवर्धक असलेल्या अनेक रानभाज्या आपल्याला ह्या प्रदर्शनात बघता येतील. लोकांना या रानभाज्यांची ओळख आणि माहिती मिळावी म्हणून मोहन माने, आणि सेंद्रिय उत्पादनांची माहिती डॉ.दिलीप माळी यांच्या परिश्रमातून साकार होत आहे.असे हे विविध अंगी रानभाज्यांचे माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.अथक प्रयत्नांनी अनेक रानभाज्यांची बियाणे व तरु वापरून त्यांची रोपे कुंड्यांत तयार करण्यात आली असून ह्या रानभाज्यांच्या कुंड्या तसेच रानभाज्यांची बी-बियाणे प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. असे वनस्पती तज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
प्रदर्शनात निसर्ग अंकुर संस्थेच्या वतीने या अनोख्या रानभाज्यांची चव चाखता यावी म्हणून, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ठेवण्यात आले असून, महाराष्ट्रात प्रथम १०० हून अधिक रानभाज्या आणि त्यांची रोपे आणि
सेंद्रिय गूळ ,मध,भाजीपाला,धान्य, हर्बल औषध,ऑरगॅनिक औषध, कंपोस्ट खत,गांडूळ खत,
भाजीपाल्याची डीहायड्रेटेड पावडर,
सेंद्रिय भाजीपाला रोपे व बी बियाणे यांच्यासह सेंद्रिय भाजीपाल्यापासून बनवलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असे एकूण ३५ स्टॉल्स प्रदर्शनस्थळी उपलब्ध आहेत.
उद्या रविवारी ५ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२:०० वाजता प्रदर्शनस्थळी खास महिलांसाठी भरवण्यात येणारी रानभाज्यांची पाककृती स्पर्धा ( ग्रामीण व शहरी विभाग ) आणि त्यासोबत रोख पारितोषिक / सर्टिफिकेट जिंकण्याची संधी मिळणार आहे.
आजच खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा .स्पर्धेत नाव नोंदवून सहभागी व्हा….
सौ . मंजिरी कपडेकर – 9373319495
ऐश्वर्या जामसंडेकर – 7620619495
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादनांची माहिती घेऊन ,चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी, महिला,आबालवृद्ध तसेच सर्व नागरिकांनी ह्या एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन एनजीओ कंपेंशन २४, कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी केले आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रदर्शन बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
चॅनल बी प्रदर्शनाचे मीडिया पार्टनर असून गार्डन क्लब कोल्हापूर, सौ.मंजिरी कपडेकर कूकींग क्लासेस, युथ ऍनेक्स आणि वुई केअर हेल्पलाईन तसेच डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालय, मलकापूर,सार्थ, व्ही.टी.पाटील फौंडेशन, सिद्धगिरी नर्सरी आणि अवनी संस्था या सर्व संस्थांच्या मोलाच्या सहकार्याने हे प्रदर्शन पार पडत आहे.
यावेळी निसर्ग अंकुरचे अध्यक्ष डॉ.मधुकर बाचुळकर, डॉ.दिलीप माळी, प्राजक्ता चरणे,भूषण पाटील, मंजिरी कपडेकर, हरीश सायवे ,शरद आजगेकर,अनुराधा भोसले, मोहन माने, अभिजित पाटील, अमृता वासुदेवन,कविता घाटगे, जितेंद्र शाह, संजय मोहिते व्ही.टी.पाटील फौंडेशन आणि गार्डन क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.