*जनसुरक्षा कायदा मागे घेण्याच्या मागणी करिता इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा*
*जोपर्यंत जनसूरक्षा कायदा मागे घेतला जात नाही; तोपर्यंत रस्त्यावरचा संघर्ष सुरूच राहणार; आमदार सतेज पाटील…*
*कोल्हापूर :* जनतेवर लादण्यात आलेला जनसुरक्षा कायदा मागे घेण्याच्या मागणी करिता इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत रस्त्यावरचा संघर्ष सुरूच राहण्याचा इशाराही यावेळी आमदार सतेज पाटील यांनी दिला.
आंदोलनकर्त्या जनतेची मुस्कटदाबी करणारे आणि घटनात्मक मुलभूत अधिकारांना विरोध करणारे, लोकशाही विरोधी जनसुरक्षा कायदा तात्काळ मागे घ्या. यासाठी राज्यभर इंडिया आघाडीच्या वतीने आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरात देखील जनसुरक्षा कायदा मागे घेण्याच्या मागणी करीत विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमानात आलेल्या हरकती डावलून महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयकाला मंजुरी दिली. हा कायदा आंदोलनकर्त्या जनतेची मुस्कटदाबी करणारा आहे. घटनेने दिलेले मुलभूत अधिकार नाकारणारा असून तो लोकशाही विरोधी असल्यानेच हा कायदा मागे घेण्याच्या मागणी करिता हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी करत जन सुरक्षा कायदा मागे घेण्याची मागणी केली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, राज्य सरकारने बहुमताचा वापर करत हा कायदा जनतेवर लादला आहे. इतर अनेक कायदे सक्षम असताना, जन सुरक्षा कायदा सरकारला हा हवा आहे. असा सवाल उपस्थित करत जनसुरक्षा कायदा जो पर्यंत मागे घेतला जात नाही तो पर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिला. याशिवाय जनतेवर हा कायदा लादण्यात आल्याने राज्य सरकारच्या कारभाराचाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी निषेध केला.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहराध्यक्ष आर के पोवार, उदय नारकर, अतुल दिघे, संपत देसाई, आनंद माने, वैभव उगळे, सचिन चव्हाण, राजेश लाटकर, चंद्रकांत यादव, बाबासो देवकर, बाबुराव यादव, संभाजी जगदाळे, बाळासाहेब सरनाईक, सतीशचंद्र कांबळे, सरलाताई पाटील, भारती पोवार, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता मांडरे, यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक, नगरसेविका कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.