*”…… तर हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते……!*
*संजय राऊत यांचे पुस्तकातून प्रकटीकरण
*हसन मुश्रीफ म्हणजे शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेले कार्यकर्ते*
*कोल्हापूर, दि. १६:*
माजी खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांनी “नरकातला स्वर्ग” हे पुस्तक लिहिले आहे. गेल्या वर्षी ईडीने अटक केल्यानंतर शंभर दिवसांच्या तुरुंगवासात त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी दि. १७ मुंबईत होत आहे. दरम्यान; या पुस्तकात श्री. राऊत यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासंबंधी एक परिच्छेद लिहिलेला आहे.
या पुस्तकाच्या पान नंबर १०२ वर श्री. राऊत यांनी लिहिलेले आहे,
” महाविकास आघाडी सरकारचे बाळंतपण साधे नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृहखाते कोणाकडे जाणार यावर पैजा लागल्या. अजित पवार पहाटेचा शपथविधी आटोपून रिक्त हस्ते पुन्हा स्वगृही परतले होते. त्यांचा विचार होईल, असे मला वाटले नव्हते. छगन भुजबळ हे तुरुंगातून सुटून आले तरी त्यांच्यावर खटले चालू होते. भुजबळ यांची गृहमंत्री होण्याची इच्छा प्रबळ होती. त्यांच्यात क्षमताही होती पण त्यांच्या तुरुंग प्रवासाची अडचण ठरली असावी. जयंत पाटील यांना गृहमंत्रिपदाची जबाबदारी नकोच होती. ‘तो एक थँकलेस जॉब आहे,’ असे त्यांचे म्हणणे होते. वळसे-पाटील यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी होत्या. कोल्हापूरचा हसन मुश्रीफ हा एक रांगडा व तगडा गडी. मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते. परंतु ते मुसलमान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना टार्गेट केले जाईल, अशी भीती पवारांना वाटली. खरं तर मुश्रीफ हे कमालीचे पुरोगामी. पक्के निधर्मी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व. शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेले कार्यकर्ते. पण शेवटी धर्म आडवा आला.”
===========