संधी मिळाल्यास सोने करण्याची महिलांची क्षमता – मा. शरद पवार
दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे अनावरण
महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या उत्तम महिला प्रशासक- मा. शरद पवार यांचे गौरवोउद्गार
पुणे दि ८ एप्रिल: संधी मिळाली तर कोठल्याही क्षेत्रात जाऊन सोने करण्याची महिलांची क्षमता आहे. त्या कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाही. याचा अनुभव मी वेळोवेळी घेतला आहे. म्हणूनच राज्य कारभार असो कि प्रशासन, साहित्य, कला , संस्कृती आणि लष्करातही महिलांची कामगिरी हि देशाला अभिमान वाटावी अशीच आहे. असे उदगार देशाचे माजी कृषी मंत्री तसेच राज्यसभा खासदार शरद पवार यांनी ११ व १२ एप्रिल २०२६ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे अनावरण करताना काढले. या प्रसंगी संयोजन समितीतील डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, अनुज नहार, कविता वानखेडे, निर्मला नलावडे, डॉ. संगीता शिंदे, मनीषा वाडेकर, सुजाता गोळे, गीता खोत, पल्लवी पासलकर, सोनाली निवंगुणे, निलेश भिंगारे, हर्षवर्धन पासलकर, प्रीतम पानसरे, अवेस शेख आणि सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार तसेच लक्ष्मीकांत खाबिया उपस्थित होते
https://sahityasammelan.sarhad.in/ या संकेतस्थळाचे अनावरण करून हे साहित्य रसिकांसाठी खुले करण्यात आले. या संकेत स्थळावर दिल्लीला होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती उपलब्ध असणार आहे.
आज देशात छत्रपती घराण्याचा मोठा सन्मान आहे. त्याच घराण्याच्या छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सरहद संस्थेच्या पुढाकाराने होणारे हे शासकीय तसेच प्रशासकीय महिलांचे साहित्य संमेलन पुढच्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या उत्तम महिला प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या नावाने होणाऱ्या या संमेलनात त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची आणि प्रतिकूल परिस्थितीत राज्यकारभार सांभाळण्याची हातोटी याची आठवण या निमित्ताने केली जाईल. हि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे.
आता महिलांना संसदेत ५० टक्के आरक्षणाचे बिल येणार आहे. या संधीची सुरुवात मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातून केली आणि महिलांना संपत्तीत मिळणारा वाटा असो कि प्रशासकीय किंवा राजकीय नेतृत्व असो महिला कुठेही मागे नाही हे आता सिद्ध झाले आहे. हे धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे याचा मला अभिमान वाटतो. या धोरणानंतर महिला सर्वच क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे नेतृत्व करताना दिसतात. म्हणूनच या शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातून होणारे विचारमंथन समाजासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे. या संमेलनाला माझ्या अंत करणपूर्वक शुभेच्छा.





