संयम, प्रयत्न, परिश्रम आणि सातत्य हेच यशाचे गमक
– मा. संजय खापरे, प्रसिध्द सिने अभिनेता
–
कोल्हापूर दि. 26 : विवेकानंद कॉलेज हे विद्यार्थ्यांच्या कला-कौशल्यांना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळवून देणारे महत्त्वाचे महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक उपक्रमांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. त्याच्यातूनच आपल्यातील सुप्त गुणांची ओळख विद्यार्थ्यांना होईल. शिक्षक विद्यार्थ्यामधील सुप्त गुण शोधून त्याला त्याप्रमाणे घडवीत असतो. विद्यार्थ्यांनी कालानुरुप स्वत:मध्ये बदल करुन घेणे आवश्यक आहे. संयम, प्रयत्न, परिश्रम आणि सातत्य हेच यशाचे खरे गमक आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा विकास करीत असताना आपल्या अवती भोवती घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. याकाळात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. असे असले तरी संघर्षाला न घाबरता सकारात्मकतेने सामोरे जाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतीन सुप्रसिध्द सिनेअभिनेते मा.श्री.संजय खापरे यांनी केले. ते विवेकानंद कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक व शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे गुणवत्ता शिष्यवृत्ती वितरण समारंभामध्ये बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.कौस्तुभ गावडे हे होते.
अध्यक्षीय मनोगतात मा.श्री.कौस्तुभ गावडे यांनी, विवेकानंद कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी सांगितलेल्या पंचसुत्रीचा अवलंब करुन महाविद्यालयाचा व संस्थेचा नावलौकिक वाढवावा. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते व इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत राहते व संस्थेच्या नावलौकिकात भर पडते. कन्फर्ट झोन हा आपला शत्रू असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कन्फर्ट झोनमधून बाहेर पडून मिळालेल्या संधीचे सोने करावे. माणसाने माणसाला माणसासारखे वागविले पाहिजे ही जाणिव विद्यार्थ्यांनी सतत वृध्दिंगत केली पाहिजे, असे मत मांडले.
विवेकानंद कॉलेजला स्वायत्तता हा दर्जा प्राप्त झालेला असल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यामुळे दर वर्षी महाविद्यालय पाच लाख रुपयांची गुणवत्ता शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देत आहे. यावेळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविलेल्या कला, क्रीडा, सांस्कृतिक, एन.सी.सी. व एन.एस.एस. विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त 200 हून अधिक विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र, गौरव चिन्ह, ब्लेझर, ट्रॅकसूट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आदर्श विद्यार्थी म्हणून श्रीशैल शिंदे, आदर्श विद्यार्थिनी प्राची मयेकर, आदर्श क्रीडा विद्यार्थी(सिनियर) निकिती मगदूम आणि आदर्श क्रीडा विद्यार्थी(ज्युनियर) श्रीवर्धन पाटील, आदर्श सांस्कृतिक विद्यार्थी म्हणून आर्यन अर्णे, आदर्श रा.से.योजना स्वयंसवेक म्हणून प्रज्योत गायकवाड, आदर्श एन.सी.सी.कॅडेट म्हणून सायली वाडकर यांना शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे गुणवत्ता शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले.
समारंभाची सुरुवात प्रतिमा पूजन व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. पाहुण्यांचे स्वा्गत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय थोरात यांनी केले. पाहुण्यांची ओळख जिमखाना चेअरमन डॉ. विकास जाधव यांनी करुन दिली. गुणी विद्यार्थी पारितोषिक वितरण यादीचे वाचन प्रा. संतोष कुंडले यांनी केले. आभार डॉ.आरिफ महात यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.सुप्रिया पाटील व प्रा.समीक्षा फराकटे यांनी केले.
कार्यक्रमास आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी, डॉ.ई.बी.आळवेकर, महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक डॉ.जी.जे.नवाथे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.आरिफ महात, मेजर सुनिता भोसले, लेप्ट्नंट जे आर भरमगोडा, प्रा.सौ. शिल्पा भोसले, प्रा.विश्वंभर कुलकर्णी, प्रा. एम.आर.नवले, प्रा.गीतांजली साळुंखे, प्रा.के.जे.गुजर, प्रा समीर पठाण, प्रा.प्रशांत कांबळे, श्री हितेंद्र साळुंखे, रजिस्ट्रार श्री.एस.के.धनवडे तसेच प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग व विद्यार्थी,विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.




