नवोन्मेष, मूल्यवर्धन आणि युवा शक्तीच्या बळावरच घडेल विकसित कृषी भारत : अशोक काकडे

Spread the news

नवोन्मेष, मूल्यवर्धन आणि युवा शक्तीच्या बळावरच
घडेल विकसित कृषी भारत : अशोक काकडे
सीआयआय -अ‍ॅग्री इनोव्हेशन समिट उत्साहात
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आयोजन

­

 

  •  

कोल्हापूर
कृषी क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देणे, काढणीनंतरच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविणे, मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न उंचावणे आणि युवा पिढीला कृषी उद्योजकतेकडे आकर्षित करणे ही काळाची गरज आहे. उद्योग, शासन, संशोधन संस्था आणि शेतकरी यांच्यातील सशक्त समन्वयातूनच भारतीय शेती अधिक उत्पादक, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावर सक्षम होऊ शकते, असे प्रतिपादन महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे (एम. ए. आय.डी. सी.)चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) दक्षिण महाराष्ट्र झोन यांच्यावतीने डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे ‘सीआयआय -अ‍ॅग्री इनोव्हेशन समिट २०२६’ मध्ये विशेष मार्गदर्शन करताना काकडे बोलत होते. चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला विद्यापीठाचे प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, सीआयआय दक्षिण महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

परिषदेत कृषी क्षेत्रातील नव्या संधी, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, मूल्यवर्धन, कृषी निर्यात आणि जागतिक स्तरावरील यशस्वी कृषी मॉडेल्स, कृषी व औद्योगिक क्लस्टर्सची निर्मिती, कृषी उद्योजकतेला प्रोत्साहन, पोस्ट-हार्वेस्ट तंत्रज्ञानाचा वापर, कृषी पर्यटन व मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या विविध संधी, शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही सखोल चर्चा करण्यात आली. नेदरलँड्स आणि इस्रायलसारख्या देशांनी कृषी क्षेत्रात साधलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा संदर्भ देत भारतीय शेती अधिक आधुनिक आणि स्पर्धात्मक बनविण्याची गरज वक्त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सीआयआय दक्षिण महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांनी स्वागतपर भाषणात विविध उपक्रमांची माहिती दिली. या परिषदेचा उद्देश स्पष्ट करत उद्योग आणि कृषी क्षेत्रातील सहकार्याचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश चितळे म्हणाले, अशा परिषदांमुळे शेतकरी, कृषी उद्योजक आणि युवकांना नव्या संधींची माहिती मिळून कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना चालना मिळते. ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय ध्येयाच्या पूर्ततेमध्ये कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहील असा विश्वास त्यानी व्यक्त केला.

कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी हरित, धवल आणि निळ्या क्रांतीचा उल्लेख करत भारताच्या कृषी विकासाचा आढावा घेतला. संशोधन, तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धतींच्या आधारे पुढील कृषी क्रांती घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांचा आणि शैक्षणिक संस्थांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, गोकुळ व नॅशनल डेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन नरके, पीडीके एएसएम कन्सल्टिंगचे व्यवस्थापकीय संचालक आबासाहेब काळे आबासाहेब काळे, सारंग जाधव आणि आदित्य बेडेकर यांच्यासह मान्यवरांनी यावेळी विचार मांडले.

प्रा. शुभदा यादव आणि प्रा. प्रियंका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सीआयआयचे दक्षिण महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे उपाध्यक्ष मल्हार भांदुर्गे यांनी आभर मानले. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. मंगल पाटील , अधिष्ठाता – सिडीसीआर प्रा. सुदर्शन सुतार, सीआयआय सचिव राजाराम काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!