महात्मा गांधीजींची दांडीयात्रा भारतीय स्वातंत्र्य लढयातील महत्त्वाचा वळण बिंदू
: प्रा.टी. के. सरगर
कोल्हापूर :
महात्मा गांधीजींनी ब्रिटीश सरकारच्या मिठावरील कराच्या विरोध 12 मार्च ते 6 एप्रिल 1930 अखेर काढलेली ऐतिहासिक दांडीयात्रा भारतीय स्वातंत्र्य लढयातील एक टर्निंग पॉइन्ट होता तसेच ही घटना जगातील दहा महत्त्वाच्या घटनांपैकी एक मानली जाते असे प्रतिपादन प्रा.टी. के. सरगर यांनी केले. ते ‘डॉ. सुनीलकुमार लवटे विचार मंचच्या’ मासिक सभेत आयोजित ‘ दांडीयात्रा’ या विषयावरील व्याख्यानात बोलताना केले. अध्यक्षस्थानी विचारमंचचे अध्यक्ष डॉ.बी.एम. हिर्डेकर होते.
प्रा.टी. के. सरगर पुढे म्हणाले- या अभूतपूर्व दांडीयात्रेने ब्रिटीश साम्राज्याला मोठा धक्का दिला. मिठाचा सत्याग्रह अहिंसेच्या मार्गाने झाल्याने सर्व जग अचंबित झाले. हजारो सर्वसामान्य भारतीयांनी या सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेऊन स्वातंत्र्यप्राप्तीच्या दिशेने वेगाने पाऊल टाकले. या यात्रेत महिलांचा सहभाग अतिशय उल्लेखनीय होता. भारतात सामाजिक समता निर्माण करण्यास या यात्रेने नैतिक बळ दिले व राष्ट्रीय एकात्मतेचे बीजारोपण केले. दांडीयात्रेमुळे महात्मा गांधीजींचे सर्वव्यापी नेतृत्व प्रस्थापित झाले. सामान्यातील सामान्य जनता ही जसे की शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, महिला, कामगार या सर्वच लोकांना भारतीय स्वातंत्र्यलढा आपल्या मुक्तीचा लढा आहे असे वाटू लागले.
या सभेत प्रा.सी.एम. गायकवाड यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच सौ. मिनाक्षी सरगर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त विचार मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांना ‘जीवन गाणे’ हे पुस्तक मोफत देण्यात आले.
या सभेस डॉ. सुनीलकुमार लवटे, विचारमंचाचे अध्यक्ष डॉ.बी.एम. हिर्डेकर, उपाध्यक्ष डॉ. प्रवीण चौगले, कार्याध्यक्ष डॉ.विश्वास सुतार, सचिव प्रा.सी.एम. गायकवाड, प्राचार्य डॉ.जी.पी.माळी, प्राचार्य इस्माईल पठाण, सौ.भाग्यश्री कासोटे पाटील, सौ. रेखा लवटे, सौ.रत्नमाला हिर्डेकर, सौ. पार्वती माळी, सौ. मिनाक्षी सरगर, के.एस. पाटील, रवींद्र वाळवेकर, महेश सूर्यवंशी, आनंद पाटील, विजय एकशिंगे, आदी उपस्थित होते. सचिव प्रा.सी.एम. गायकवाड यांनी स्वागत केले तर संजय कळके यांनी आभार मानले.





