शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी उद्यापासून तीन दिवस शेतीचे पाणी सुरू होणार! राजू शेट्टी.

Spread the news

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी उद्यापासून तीन दिवस शेतीचे पाणी सुरू होणार! राजू शेट्टी.

­

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी )
गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी पुकारलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असून, उद्यापासून पुढील तीन दिवसांसाठी शेतीसाठीचा पाणीपुरवठा आणि उपसा पूर्ववत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मा. खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिले.

  •  

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही, राज्य सरकार आणि प्रशासनाकडून पाणी परिस्थितीबाबत चुकीचा अहवाल सादर करण्यात आला होता. या चुकीच्या माहितीच्या आधारे प्रशासनाने जिल्ह्यात शेतीसाठी पाणी उपसाबंदीचे आदेश लागू केले होते. ऐन उन्हाळ्यात पाणी बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उभी पिके वाळू लागली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती.

प्रशासनाच्या या अन्यायी निर्णयाविरोधात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी एकत्र आले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात चिकाटीने आणि आक्रमकपणे आंदोलन सुरू ठेवले होते. हक्काचे पाणी नाही मिळाले तर उद्याचा अमित शहा यांच्या सभेत गोंधळ करून दौरा सुरळीत होवू न देण्याचा इशारा यावेळी राजू शेट्टी यांनी प्रशासनाला दिला. ‘पाणी आमच्या हक्काचे’ अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर शेतकऱ्यांच्या या एकजुटीपुढे आणि तीव्र संघर्षामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले.

जिल्ह्यातील पाणीसाठ्याची वास्तविक परिस्थिती आणि पिकांचे होत असलेले नुकसान पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार पुढील तीन दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे सुरू राहील. या तीन दिवसांच्या कालावधीनंतर जिल्हा प्रशासन आणि शेतकरी प्रतिनिधींची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेऊन पुढील पाण्याच्या आवर्तनाबाबत (नियोजनाबाबत) अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी गजानन गुरव , जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर , जिल्हाध्यक्ष अजित पोवार , राजेंद्र गड्यान्नावर , राजाराम देसाई , धनाजी पाटील , संजय बेले , सचिन शिंदे , विश्वास कोळी , डॅा. बाळासाहेब पाटील , यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!