कोल्हापूर, महाराष्ट्र येथे नवीन ‘आधार सेवा केंद्र’ सुरू करून युआयडीएआयने (UIDAI) नागरिक-केंद्रित सेवांचा केला विस्तार
दिनांक: १६ जुलै २०२६
स्थळ:कोल्हापूर
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय मुंबई यांनी आज कोल्हापूर, महाराष्ट्र येथे नवीन ‘आधार सेवा केंद्र’ सुरू केले. यामुळे विश्वासार्ह डिजिटल ओळख सेवा प्रदान करण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट अधिक बळकट झाले असून, ‘डिजिटल इंडिया’च्या संकल्पनेला गती मिळाली आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये:
सुलभ आणि सोयीस्कर उपलब्धता: हे आधार सेवा केंद्र शाहूपुरी, चौथी गल्ली, कुमठेकर फर्निचरजवळ, कोल्हापूर, महाराष्ट्र – ४१६०१२ येथे स्थित आहे. हे केंद्र आठवड्याचे ७ ही दिवस सुरू राहील. येथे नवीन आधार नोंदणी, ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, लोकसंख्याशास्त्रीय सुधारणा आणि जागेवरच तक्रार निवारण यांसारख्या सेवा उपलब्ध असतील.
सर्वसमावेशक पायाभूत सुविधा: या केंद्रामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था, सुलभ प्रसाधने आणि विनाअडथळा सेवा सुनिश्चित करण्यासाठी एक समर्पित ‘आधार सेवा केंद्र व्यवस्थापक’ तैनात करण्यात आले आहेत.
डिजिटल साधनांचा वापर: नागरिक युआयडीएआयच्या अपॉइंटमेंट पोर्टलवर (https://bookappointment.uidai.gov.in) जाऊन आगाऊ वेळ (Appointment) आरक्षित करू शकतात. तसेच, या केंद्राचे भौगोलिक स्थान ‘भुवन आधार पोर्टल’वर (https://bhuvan-app3.nrsc.gov.in/aadhaar) उपलब्ध आहे.
भविष्याभिमुख सेवा: पुढील पिढीची डिजिटल ओळख सुरक्षित करण्यासाठी शाळांमध्ये विशेष बायोमेट्रिक अपडेट शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
मान्यवरांची उपस्थिती:
या उद्घाटन सोहळ्याला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी डॉ. विजय राठोड (IAS), कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी (RDC) श्री. गजानन गुरव आणि युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय मुंबईचे उपसंचालक श्री. मंदार जेवरे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि सेवा पुरवठादार कंपनी बीएलएस इंटरनॅशनलचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी डॉ. विजय राठोड (IAS) म्हणाले:
“कोल्हापुरातील हे आधुनिक आधार सेवा केंद्र येथील नागरिकांना जलद, अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा सुनिश्चित करेल. ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकार करण्याच्या आणि आपल्या राष्ट्रीय पाऊलखुणांचा विस्तार करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
उद्घाटन प्रसंगी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी डॉ. विजय राठोड (आय.ए.एस.) यांनी स्वतः नव्याने सुरू झालेल्या आधार सेवा केंद्रात आधार बायोमेट्रिक अद्ययावतकरण सेवा घेतली आणि नागरिकांनाही या सुविधांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले.
सर्व आधार सेवा केंद्रे थेट युआयडीएआय (UIDAI) द्वारे त्यांच्या भागीदारांच्या माध्यमातून चालवली जातात, जेणेकरून सेवांचे समान मानक, भक्कम डेटा सुरक्षा आणि वेळेवर तक्रार निवारण सुनिश्चित करता येईल. प्रत्येक नागरिकाला एक विश्वासार्ह डिजिटल ओळख प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा युआयडीएआयने या माध्यमातून पुनरुच्चार केला आहे.




