:*निकोप लोकशाहीसाठी पुन्हा स्वातंत्र्याची लढाई लढण्याचा निर्धार:*
*:९ ऑगस्ट रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन:*
:सांगलीत क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन:
विविध सामाजिक संघटना, मान्यवरांची उपस्थिती;
कुपवाड, प्रतिनिधी : स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते, सत्याग्रही आणि प्रतिसरकारचे शिल्पकार क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त सांगली येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, समाजसेवक, विद्यार्थी, युवक आणि स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी बोलताना ॲड. अजित सूर्यवंशी म्हणाले ,क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज गरज आहे. केवळ विचार मांडण्यापेक्षा ते प्रत्यक्ष कृतीत उतरविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अन्यायाविरोधात तरुणाई जागृत होत असून, त्यांना योग्य दिशा देत सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले ,केंद्रातील आणि राज्यातील भाजप प्रणित सरकारने देशांमधील श्रमजीवी कष्टकरी मुला मुलींचे शिक्षणच बंद करण्याचा घाट घातला आहे.
देशात सर्वसामान्यांना जगणे दिवसेंदिवस कठीण होत चाललेले आहे बेरोजगारी आणि महागाईने कळस गाठला आहे या धोरणा विरुद्ध पुन्हा एकदा स्वतंत्र्याची लढाई लढावी लागणार आहे. यासाठी ९ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार आणि नागरिक बंधू भगिनींनी त्याचप्रमाणे विद्यार्थी युवकांनी सांगली येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकातील क्रांतिसिंहाच्या पुतळ्यासमोर सकाळी १०. वाजता धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रविवारी दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता धरणे मागणी आंदोलनात जिल्ह्यातूनही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास ॲड. तेजस्विनी सूर्यवंशी, अनिल माने, प्रमोद लाड, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, डॉ. संजय पाटील, युवराज शिंदे, सदाशिव मगदूम, नंदकुमार सुर्वे, नानासाहेब देशमुख, ॲड. शरद जगधने, कॉ. मारुती शिरतोडे, अजय देशमुख, अशोक पोरे, विद्या पोरे, रत्नाकर गोंधळी, रोहित पाटील, प्रशांत पवार यांच्यासह विविध पक्षांचे नेते, समाजसेवक, विद्यार्थी, युवक आणि स्वातंत्र्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या राष्ट्रसेवा, सामाजिक न्याय आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.




