रक्ताचं नातं नसतानाही जुळली मायेची नाळ; स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या मनगटावर प्रेमाची राखी!

Spread the news

*रक्ताचं नातं नसतानाही जुळली मायेची नाळ; स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या मनगटावर प्रेमाची राखी!*

­

 

*स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा*

  •  

कागल – दि: 28/08/2026
भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अनन्यसाधारण महत्त्व असून प्रत्येक सणातून प्रेम, आपुलकी, बंधुभाव, सामाजिक एकोपा आणि माणुसकीचा संदेश मिळतो. याच भावनेतून दूधगंगा विद्यालय, धरणग्रस्त वसाहत, कागल येथील विद्यार्थिनींनी स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी-अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय, कागल येथील विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा अनोखा व भावनिक सोहळा साजरा केला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सण आणि संस्कृतीचे महत्त्व सांगितले. भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण हा केवळ परंपरा नसून त्यामागे मानवी मूल्ये आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दडलेला आहे. रक्षाबंधनातून प्रेम, विश्वास, संरक्षण, बंधुभाव आणि नाती जपण्याची शिकवण मिळते. विद्यार्थ्यांनी सण साजरे करताना त्यामागील माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक समतेची मूल्ये आत्मसात करावीत, असे त्यांनी सांगितले.
*रक्षाबंधनानिमित्त दूधगंगा विद्यालयातील विद्यार्थिनींनी बौद्धिक अक्षम विद्यालयाला भेट देत तेथील विद्यार्थ्यांच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधली. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य आणि आनंदाचे क्षण सर्वांच्या मनाला स्पर्शून गेले. रक्ताचे नाते नसतानाही प्रेम, माया आणि आपुलकीच्या धाग्याने निर्माण झालेले हे बंधुभावाचे नाते वैशिष्ट्यपूर्ण ठरले.*
*या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांप्रती आपुलकी, समता, सहानुभूती आणि संवेदनशीलता व्यक्त करण्याची संधी मिळाली. दोन्ही विद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला हा जिव्हाळा उपस्थितांसाठी भावनिक अनुभव ठरला.*

दरम्यान, दूधगंगा विद्यालयातही रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या परिसरातील वृक्षाला राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वृक्ष आपल्याला प्राणवायू, सावली, फळे आणि जीवनदायी आधार देतात. त्यामुळे वृक्षांचे संरक्षण करणे म्हणजे आपल्या जीवनाचे संरक्षण करणे होय, या भावनेतून विद्यार्थ्यांनी वृक्षाला राखी बांधली.
मानवी नात्यांबरोबरच निसर्गाशी असलेले आपले नाते जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. एकीकडे विशेष विद्यार्थ्यांच्या मनगटावर मायेची राखी बांधून बंधुभाव जपला, तर दुसरीकडे वृक्षाला राखी बांधून पर्यावरणाशी असलेली नाळ अधिक घट्ट केली.

*“राखीचा धागा मनगटावर बांधला; पण त्यातून माणुसकीच्या नात्यांची वीण अधिक घट्ट झाली,” अशा भावनिक वातावरणात रक्षाबंधनाचा हा अनोखा उपक्रम उत्साहात व संस्मरणीय पद्धतीने पार पडला.*


Spread the news

You may also like

error: Content is protected !!