*कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील खुपिरे येथील आज दि.३ रोजीची शक्तीपीठ महामार्ग विरोधातील सभा रद्द.. शेतकरी बांधवाचा निर्णय*
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील खुपिरे येथे आज, ३ सप्टेंबर २०२६ रोजी, प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ‘शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती’ची विरोध सभा रद्द करण्यात आली आहे. काल रात्री उशिरा खुपिरे गावात झालेल्या महत्वाच्या बैठकीत ज्यांची जमिन या महामार्गात जात नाही तेच आंदोलनाला पुढे पुढे करत आहेत. त्यांनी ग्रामस्थांना त्यांच्या जमेत धरु नये. गावात सर्वजण गुण्या गोविंदाने नांदत असून, बाहेरून कोणी येवून गावाच्या नांवावर राजकारण करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड इशारा ‘शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या समन्वयकाना दिला. त्याचबरोबर आमदार राजेश क्षीरसागर हे शेतकरी हिताची भूमिका, शेतकरी आणि राज्य शासन यांच्या समन्वय आणण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्याविरोधात कोणतीही वक्तव्ये केली जाऊ नयेत नाही तर सभा उधळून लावली जाईल, असा इशारा दिला. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याला आपली शेती स्वखुशीने महामार्गासाठी द्यायची आहे, त्याच्यावर कोणताही दबाव आणू नये. त्या शेतकऱ्यांचे समर्थन असो वा विरोध त्याची भूमिका मांडण्याचे त्याला स्वातंत्र आहे. विरोधी समितीने गावकऱ्यांच्या संमती शिवाय किंवा गावकऱ्यांना विचारात घेतल्याशिवाय कोणतीही भूमिका घेवू नये, अशा सूचना दिल्या. यानंतर झालेल्या चर्चेत गावात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होवू नये याकरिता सर्वानुमते सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस पैलवान दाजी पाटील, हनुमान दुध संस्थेचे चेअरमन युवराज पाटील, वीर हनुमान दुध संस्थेचे चेअरमन सरदार पाटील, सतीश जाधव, शिवाजी जाधव, ओंकार पाटील, शुभम पाटील, सुरज जाधव, संदीप जाधव, सागर पाटील, शेतकरी संघटनेचे पांडुरंग शिंदे, संताजी पाटील, गवळी यांच्यासह खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.



