*आमदार शिवाजी पाटील यांच्यावर शंभर कोटींचा फौजदारी बदनामीचा दावा न्यायालयात दाखल करणार*
*वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा*
कोल्हापूर, दि. ६:
आमदार शिवाजी पाटील यांनी गेल्या पाच वर्षात गोकुळमधील साधा “ग” सुद्धा कधी ऊच्चारलेला नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतरच त्यांना हा सगळा साक्षात्कार झालेला दिसतोय. त्यामुळेच अलीकडच्या काळात ते सातत्याने माझ्यावर आरोप करीत सुटले आहेत. मी मात्र श्री. पाटील यांच्यावर काहीही बोलणार नाही, असे यापूर्वीच सांगितलेले होते आणि बोलणारही नव्हतो. परंतु; काल त्यांनी माझ्यावर “हसन मुश्रीफ यांनी नोटाबंदीच्या काळात स्वतःकडील कोट्यावधी रुपये बँकेत आणून बदलून घेतले आणि बँकेला अडचणीत आणले”, असा व्यक्तिशः बदनामीकारक आरोप केला. त्यामुळे, मी त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा फौजदारी बदनामीचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचा इशारा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.
मंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मी गेल्या ३५-४० वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या वाटचालीमध्ये माझ्या वैयक्तिक प्रतिमेला फार जपत आलो आहे. मी कुठलीही गोष्ट मान्य करीन. परंतु; माझी प्रतिमा, माझा स्वाभिमान, माझ्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन कधीही बदलता कामा नये, यासाठी मी पडेल ती किंमत देऊन मी कायदेशीर लढाई लढत असतो. आजपर्यंत ज्या- ज्या वेळी माझी व्यक्तिशः बदनामी केली, त्यांच्याविरोधात मी १०० कोटी रुपयांचे फौजदारी बदनामीकारक दावे न्यायालयात दाखल केलेले आहेत. माझ्यावतीने दाखल होत असलेला हा दहावा दावा आहे.
आमदार शिवाजी पाटील यांनी माझ्यावर केलेल्या या वक्तव्यातून त्यांनी माझी व्यक्तीश: बदनामी केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत त्यांनी यासंबंधीचे पुरावे जाहीर करावेत. अन्यथा; त्यानंतर त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा फौजदारी बदनामीकारक दावा दाखल करणार आहे.
श्री. यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, आमदार शिवाजी पाटील यांनी असेही वक्तव्य केले आहे की, “केडीसीसी बँकेकडून साखर कारखान्यांसह इतर संस्थांना अर्थपुरवठा केला जातो. त्यामुळे मुश्रीफ यांच्या विरोधात जाण्यास आमदार घाबरतात”. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे हासुद्धा आमदारांचा, माझ्या संचालकांचा, कारखानदारांचा आणि समस्त शेतकऱ्यांचाही अपमानच आहे.
*हे करूनच दाखवाच……!*
श्री. मुश्रीफ यांनी पुढे म्हंटले आहे, आमदार श्री. पाटील हे गोकुळ दूध संघ आणि के. डी. सी. सी. बँकेत चौकशी लावतो, हे करतो आणि ते करतो, अशा नुसत्या बाष्कळ गप्पा मारत आहेत. त्यांनी ते एकदा करूनच दाखवावच. कारण; आम्ही संस्था कशा स्वच्छ, पारदर्शी आणि सभासदाभिमुख चालविलेल्या आहेत, हे सगळ्या सभासदांना आणि जनतेलाही माहीत आहे.
======




