रसिकांनी लुटला सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद; कवाल्ली महोत्सवाचा शानदार समारोप
कोल्हापूर दि : 23 ( जिमाका ) शहरात २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत डॉ.व्ही.टी.पाटील स्मृतिभवन येथे सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य (मुंबई ) आयोजित तीन दिवसीय कव्वाली महोत्सवाचा समारोप सोमवारी रात्री मोठ्या शानदार व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा शनिवार २१ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला.या दिवशी हाजी सुलतान नाजा (मुंबई) आणि तोहीद अली (पुणे) यांनी आपल्या दमदार आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले तर रविवार २२ फेब्रुवारी रोजी राहुल शिंदे (पुणे) यांनी मराठी कव्वाली शानदाररित्या साजरी केली. अंतिम दिवशी म्हणजे सोमवार २३ फेब्रुवारी रोजी कव्वाली क्षेत्रातील नामवंत नाव असलेले हैदर नाजा (पुणे) यांनी हिंदु – मुस्लीम ऐक्यावर ‘ मेरी जान जाए – वतन के लिए ‘ ही कव्वाली सादर करताच रसिकांनी वन्स मोअरचा ठेका धरला. त्यानंतर ‘ दमा – दम – मस्त कलंदर’ या कव्वालीने संपूर्ण सभागृहात चैतन्यदायी वातावरण निर्माण केले. तरुणाईच्या स्वप्नातील, ‘दुल्हे का सेहरा सुहाना लगता है या कव्वालीने तरुणाईला डोलायला लावले . या कव्वाली महोत्सवाचे तितकेच सुरेल निवेदन पंडीत कंदले यांनी केले. यावेळीअनंत खासबागदार, राहूल चिकोडे, मच्छिंद्र पाटील, अमित घरत यांच्यासह अनेक कव्वाली प्रेमी रसिक उपस्थित होते .



