जैन धर्माची मुळ तत्वे विश्वामध्ये शांतता प्रस्थापित करू शकतात
– आचार्य किर्तियशसूरजी महाराजा
सद्या जग विविध युध्दांच्या सावटाखाली अशांततेचा दाहक अनुभव घेत आहे. भगवान महावीरांनी जगाला दिलेली जैन धर्माची अहिंसा, अपरिग्रह, अनेकांतवाद, स्थाद्वाद, अचौर्य ही मुलभुत तत्वे जगातील सर्व वाद थांबवु शकतील अशी सामर्थ्यशाली आहेत असे प्रतिपादन जैन धर्मीयांचे राष्ट्रीय स्तरावरील वरीष्ठतम आचार्य किर्तियशसूरीश्वरजी महाराजा यांनी केले.
विश्वशांती अष्टान्हिका महोत्सव व साकलचंद गोमराजजी गांधी व टिपूबेन साकलचंद गांधी यांचा उपकार स्मरण महोत्सवानिमित्त आचार्यश्री 50 हून अधिक साधु साध्वी समुदायासह कोल्हापूर येथे आले आहेत. सोमवारी बिंदु चौकातुन भव्य शोभायात्राद्वारे आचार्य यांचे प्रचंड उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. जैन महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) ललित गांधी यांनी गुरूवंदना करून मिरवणूकीचा शुभारंभ केला.
21 घोड्यांचे शांती संदेश देणारे अश्वदल शोभायात्रेच्या अग्रभागी होते. जैन धर्मीयांच्या तीर्थंकर व गच्छाधिपती रामचंद्र सूरीश्वरजी महाराजा यांच्या प्रतिमांचे रथ, विविध प्रकारची वाद्यवृंदे, धनगरी ढोल, एन.सी.सी. छात्र-छात्रांची पथके, शाही लवाजमा, तुतारी वादक यांचा समावेश असलेली भव्य मिरवणूक बिंदु चौकातुन प्रारंभ होऊन गुजरी मंदीराजवळ विसर्जित झाली.
मिरवणुक मार्गात ठीकठीकाणी जैन धर्मीयांनी गहुली द्वारे आचार्यांचे स्वागत केले. विविध महिला मंडळानी मंदिर परीसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती.
आचार्यश्रींचे प्रभावी व प्रेरणादायी प्रवचन ऐकण्यासाठी सकल जैन समाजासह इतर समाजातीलही मोठ्या संख्येने श्रावक-श्राविका उपस्थित होते. धर्म, संयम, साधना आणि जिनशासनाच्या तत्त्वांवर त्यांनी केलेले मार्गदर्शन उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले.
दुपारी भक्तिभावाने पाटला पूजन विधी नवीनभाई गुरुजी यांच्या हस्ते संपन्न झाला. सुप्रसिद्ध गायक राज फोफाणी व पार्थ वखारिया यांनी आपल्या मधुर स्वरांनी संपूर्ण वातावरण भक्तिरसाने ओतप्रोत केले.
संध्याकाळी भगवानांची आकर्षक अंगी रचना व मंदिराची मनोहर, नयनरम्य सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. भक्तिमय गायनामुळे उपस्थित सर्व श्रावक-श्राविका भावसमाधीत तल्लीन झाले.
हा आठ दिवसांचा अष्टािेका महोत्सव विश्वशांती, सद्भावना आणि सर्व जीवांच्या कल्याणासाठी आयोजित करण्यात आला असून, संपूर्ण काळात विविध धार्मिक विधी, पूजन, प्रवचन व भक्ति कार्यक्रमांच्या माध्यमातून शांती, अहिंसा आणि धर्मसंवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे.
संभवनाथ जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र अमिचंद राठोड, उपाध्यक्ष राजेश धनराज ओसवाल, लक्ष्मीपुरी ट्रस्टचे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, भक्तीपूजा नगर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र ओसवाल, भरत गांधी, मेघ गांधी, दर्शन गांधी यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या सं‘येने उपस्थित होते.





