शहरवासीयांच्या मुलभूत सोयी सुविधेत होणारा विलंब खपवून घेणार नाही; अमृत योजनेतील कामे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करा : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
शहरातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबतच्या बैठकीत नागरिकांसमोरच अधिकारी आणि ठेकेदारांचा सोक्षमोक्ष
कोल्हापूर दि.२१ : शहरवासियांना मुलभूत सोयी सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि मुलभूत सोयी सुविधा विना अडथळे, विनाविलंब पुरविणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु, ठेकेदारांचा निष्काळजीपणा आणि अधिकाऱ्यांचे होणारे दुर्लक्ष यामुळे नागरिकांना हक्काच्या सोयी सुविधांमध्ये अभाव दिसून येत आहे. महापालिकेचा कारभार सुधारावा म्हणून वारंवार सूचना देवूनही कामात प्रगती दिसून येत नाही. याचा रोष जनतेतून व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. शहरवासीयांच्या मुलभूत सोयी सुविधेत होणारा विलंब खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला.
उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, नागाळा पार्क परिसरातील अपुऱ्या व दुषित पाणीपुरवठ्याबाबत शाहूपुरीत नागरिकांच्या विनंती नुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी पाणीपुरवठ्याबाबतच्या असंख्य तक्रारींचा पाढाच वाचून दाखविला. शहरातील अपुऱ्या व दुषित पाणी पुरवठ्याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत अधिकारी आणि ठेकेदारांच्या कामाचा नागरिकांसमोरच सोक्षमोक्ष लावला.
यावेळी सूचना देताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेत कोणाचाही हस्तक्षेप, दडपण खपवून न घेता नागरिकांना समान पद्धतीने पाण्याचे वाटप होईल याची दक्षता घ्या. जनतेला मिळणाऱ्या मुलभूत सोयी सुविधेत अडथळे येता कामा नयेत. अपुऱ्या पाणी पुरवठ्याची कारणे शोधून त्याचा अहवाल सादर करा. ज्या ठिकाणी नव्याने पाईपलाईन टाकाव्या लागणार आहेत त्या सर्व ठिकाणचा आराखडा तयार करून त्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, अशा सूचना दिल्या.
चौकट
अमृत १ योजनेचे काम मे अखेरीस पूर्ण करा, अन्यथा ठेकेदारावर फौजदारी दाखल करा : आम.क्षीरसागर
अमृत १ योजनेतून शहरातील पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम सुरु आहे. कामाच्या निविदेप्रमाणे काम सुरु केल्यानंतर दोन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, गेली सात वर्षे हे काम सुरूच आहे. या कामास इतका विलंब का? असा सवाल करीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी ठेकेदार काम करण्यास टाळाटाळ करत असेल तर त्याला ब्लॅक लिस्ट करून फौजदारी गुन्हा दाखल करावा. नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधांवर अडथळा निर्माण करणाऱ्यांची हयगय करू नका. मुबलक पाणी पुरवठ्याची जबाबदारी प्रशासनाची असून, प्रसंगी ठेकेदार बदलून ही कामे अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून पूर्ण करून घ्यावीत. माहे मे २०२६ च्या अखेरपर्यंत अमृत १ योजनेतील प्रलंबित सर्व कामे पूर्ण करा, अन्यथा ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा, असा सज्जड इशाराही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला.
यावेळी नगरसेविका निलिमा पाटील, माजी नगरसेवक अजित मोरे, शैलेश पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जलअभियंता हर्षजीत घाटगे, अभियंता मयुरी पटवेगार, अमोल मिंचे, धवल पाटील, अजय मोहिते, भरत पाटील, विकास घागरे, सचिन पवार, रंजना शिर्के व भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.