शिरोळ तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आदेश
शिरोळ :
गुरुवारी रात्री गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरोळ तालुक्यात शेती, घरे व जनावरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांचे उभे पीकही मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तहसीलदार यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
गुरुवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे स्थानिक अडथळा निर्माण झाला. घरांवरील पत्र्यांच्या शेड उडून गेल्याने नागरिकांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी जनावरांच्या गोठ्यांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
शेती क्षेत्रालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. भाजीपाला, फळबागा व इतर पिके वाऱ्यामुळे आडवी झाली असून शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे, अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या सर्व नुकसानीची दखल घेत आमदार यड्रावकर यांनी तहसीलदारांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.




