सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गत हंगामात गाळपास गेलेल्या ऊसास प्रतिटन १०० रूपये दुसरा हप्ता तातडीने देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने श्रीमती. उज्वला पळसकर प्रादेशिक साखर सहसंचालक कोल्हापूर यांचेकडे केली.
गत वर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम संपून मोठा कालावधी उलटून गेला तरी अद्याप अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काचा हा दुसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यावर जमा केलेला नाही. सध्या नवीन हंगामाची पूर्वतयारी सुरू असून गगनाला भिडलेल्या महागाईमुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि मशागतीसाठी पैशांची अत्यंत आवश्यकता आहे. कारखानदारांच्या या दिरंगाईमुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.
त्याबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने मोठ्या प्रमाणात सर्रास काटामारी व रिकव्हरी चोरी करत असल्याने दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखान्यास ५०० टनापेक्षा जादा गाळप केलेल्या शेतकऱ्यांची यादी गावनिहाय जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती.गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने ही माहिती न दिल्याने सदर माहिती तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
सध्या साखर कारखान्यांच्या साखरेसह इतर उपपदार्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगले भाव मिळाले आहेत. यामुळे दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखान्यांना १०० रूपये दुसरा हप्ता देणे सहज शक्य आहे. तरी दोन्ही जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना तातडीने आदेश निर्गमित करून दुसरा हप्ता प्रतिटन १०० रूपये शेतक-यांच्या खात्यावर येत्या १५ दिवसात जमा करण्यात यावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना कारखानानिहाय तीव्र आंदोलन सुरू करून साखर कारखान्यांची साखर व उपपदार्थ विक्री रोखण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पोवार , राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर , राज्य कार्यकारिणी सदस्य जयकुमार कोले , सचिन शिंदे , विशाल चौगुले , पुरंदर पाटील , डॅा. बाळासाहेब पाटील, तानाजी देसाई, तानाजी मगदूम , अरूण मगदूम , बाजीराव पाटील , धुळगोंडा पाटील , नितेश कोगनोळे यांचेसह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.




