गेले सांगून ज्ञाना तुका, झाला उशीर तरीही शिका!
पालखी मार्गावर साक्षरतेचा जागर
कोल्हापूर-कोकण विभागीय अध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यक्रम
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर गुरुवारी तरडगाव (जि. सातारा) येथे साक्षरता वारीच्या चमूने साक्षरतेच्या घोषणा, माहिती पत्रकांचे वाटप, भारुड, पोवाडा व साक्षरता गीते गायन, मुलाखती, असाक्षरांची नोंदणी अशा उपक्रमांनी शानदार जनजागृती केली. कोल्हापूर कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष तथा उल्लास चे विभागीय समन्वयक राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत साक्षरता गीते व घोषणांच्या निनादात पथकाने वारकऱ्यांना आपलेसे केले. वारकऱ्यांशी समरस होत पथकाने फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला..
केंद्र पुरस्कृत उल्लास कार्यक्रमांतर्गत मागील तीन वर्षापासून योजना शिक्षण संचालनालय पुणे यांनी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या समवेत जनजागृतीसाठी साक्षरता वारीचा उपक्रम सुरू केला आहे. या दोन प्रमुख पालखी सोहळ्यात राज्यभरातून सर्व जिल्ह्यातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी असतात, त्यात असाक्षरांचे प्रमाणही मोठे असते.
या पथकामार्फत भारुड,साक्षरता गीते,पोवाडा गायन,शाळा स्तरावर कार्यक्रम,पत्रक वाटप, पालखी मार्गावरील गावोगावी
भित्तीपत्रक चिटकवणे, प्रत्यक्ष दिंडीत जनजागृती, मुलाखती, शिक्षणाचे महत्व यावर चर्चा असे उपक्रम घेण्यात येत आहेत.
दोन्ही प्रमुख पालखी मार्गावर पुणे व पिंपरी चिंचवड मनपा च्या सहकार्याने साक्षरता रथ पालखी सोहळ्यासोबत आहेत. आळंदी पंढरपूर मार्गावरील साक्षरता वारी पथकात विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक, उल्लास साक्षरता कार्यक्रमाचे राज्य प्रचारक संभाजी देशमुख,
स्वंयसेवक – लवबाबा गायकवाड,नागसेन साबळे,अनंता पोकळे,राजेश गुंजाळ, ज्ञानदेव सस्ते यांचा समावेश आहे.
नागसेन साबळे (बुलढाणा) हे स्वयंसेवक वयस्कर आई-वडिलांसह सहकुटुंब या साक्षरता पथकासोबत सामील झाले आहेत, त्यांच्या उत्तम सादरीकरणाने पालखी सोहळ्यातील वारकरी साक्षरता वारीकडे आकृष्ट होत आहेत, बाई अंक घे ग,
अक्षर घे..चला होऊ या साक्षर चला लिहूया अक्षर…
गोमू संगतीन माझ्या तू शिकशील काय.. यासारख्या गाण्यांवर वारकरी या पथकासोबत ठेका धरत
आहेत.
तर,जन जन साक्षर.. गेले सांगून ज्ञाना तुका,झाला उशीर तरीही शिका.. अक्षर कळे,संकट टळे.. अंगठा नको सही हवी.. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा.. अशा साक्षरतेच्या घोषणांनी लक्ष वेधले.




