पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाला कोल्हापूर जिल्हयात प्रारंभ, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडला भाजपच्या विकास योजनांचा आढावा

Spread the news

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाला कोल्हापूर जिल्हयात प्रारंभ, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडला भाजपच्या विकास योजनांचा आढावा

­

 

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत चौथ्या क्रमांकाचा देश बनला असून, आत्मनिर्भर भारत अभियान यशस्वी झाले आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सक्रिय रहावा, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने, पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपूर्ण देशभर सुरू आहे. जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती असतानाही, भारतात शांतता असून सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. अशा परिस्थितीत फेक नॅरेटिव्ह पसरवणार्‍या कॉंग्रेसने लोकांची दिशाभूल करण्याचा डाव आखला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार देशाला प्रगतीपथावर नेत आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले.
करवीर तालुक्यातील सांगरुळ, शिये, परिते मंडळातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी, बालिंगा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी, या अभियानाची माहिती दिली. देशाच्या विकासासाठी पंडित दीनदयाळ, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवणी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे योगदान आहे. २०४७ साली विकसीत भारताचे ध्येय पूर्ण झाले असेल. भाजपने १० कोटी घरात शौचालये उभी केली. १० कोटी घरात उज्वला गॅस दिले. जलजीवन मिशन योजना सुरू केली. चार कोटी घरकुले पूर्ण झाली, तर आणखी ३ कोटी घरकुले उभारली जातील. याउलट कॉंग्रेसच्या काळात ३५ कोटी जनतेला दोनवेळचे अन्नधान्यही मिळत नव्हते. कॉंग्रेसच्या काळात टूजी- थ्रीजी घोटाळा, कोळसा घोटाळा अनेक अपहार आणि घोटाळे झाले. त्यामुळे जनतेनेच देशात सत्तांतर घडवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने देशातील पायाभूत सुविधांमध्ये भर टाकली. जागतिक अर्थव्यवस्थेत भारत चौथ्या क्रमांकाचा देश बनला असून, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, हर घर मे नल, घर तिथे शौचालय अशा अनेक योजना यशस्वी झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नातून देशातील २५ कोटी पेक्षा अधिक कुटुंबे दारिद्रय रेषेच्या वर आल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगरसेवक अजित ठाणेकर, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, संभाजी पाटील, अमर जत्राटे, हंबीरराव पाटील, संताजी घोरपडे, बुथ प्रमुख विकास पाटील, सतीश पाटील, सुशीला पाटील, नवनाथ पवार, प्रकाश पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!