आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी स्वाभिमानी जनतेच्या जीवावर संघर्ष करून दखल घेण्याइतपत यश मिळवले आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.
याउलट प्रत्येक निवडणुकीमध्ये दुसऱ्याच्या जीवावर मोठ्या बहुमताची भाषा करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत किती नगरसेवक ,जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले ?
केवळ पक्षीय झुल पांघरूण मोठ्या बाता त्यांनी मारू नयेत.
गोकुळच्या निवडणुकीत अजून पुलाखालून बरेचसे पाणी वाहून जायचे आहे. त्यामुळे आगे आगे देखो होता है क्या, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी खा. महाडिक यांना पत्रकातून दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत पराभवाचा दणका देताना दिलेल्या पावणे तीन लाखाच्या जखमा त्यांनी विसरू नयेत. गोकुळच्या निवडणुकीत स्वाभिमानी सभासद पराभवाचा दणका देतील, असा पलटवार आ.पाटील यांनी केला आहे
पत्रकात पुढे म्हटले आहे की,
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांच्या पाच ते सात जागा निवडून येतील अशी दर्पोक्ती महाडिकांनी केली होती. महायुतीमधील तीन भावकीतील झाडून सारे नेते एका बाजूला असताना ३४ नगरसेवक निवडून आणून आम्ही ताकद दाखवून दिली, हे महाडिक यांनी ध्यानात घ्यावे .
गोकुळवर तुमची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांकडून कधीही राजकीय हस्तक्षेप झाला नाही, असे मी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. याचा अर्थ तुमचा कारभार चोख होता किंवा तुमच्या कारभाराला माझ्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे, असे अजिबात समजू नका.
गोकुळला मल्टीस्टेट करुन जिल्ह्यातील दूध संस्थांचे महत्व कमी करणे, तुमच्या मालकीचे टँकर, पॅकिंगचा ठेका यासह अनेक कारनाम्यांच्या भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळूनच गेल्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी सत्तांतर केले होते.
तुम्ही कधी स्वतः संस्था काढत नाहीत तर दुसऱ्यांनी काढलेल्या संस्था बळकवतात, हा इतिहास सर्वांना माहीत आहे.
रडीचा डाव खेळून ज्या राजाराम कारखान्याची सत्ता तुम्ही मिळवली त्या कारखान्यावर ३५६ कोटींचे कर्ज आहे. एकीकडे तुम्ही कोट्यवधींचे कर्ज उचलले असताना या हंगामात उसाचे एकही कांडे गाळप झाले नाही.उलट या कर्जाच्या व्याजाचा बोजा मात्र सभासदांच्या अंगावर पडला आहे, याची जबाबदारी खासदारांनी घ्यावी.
दुसरीकडे भीमा सहकारी साखर कारखान्याला सभासदांची ३० कोटींची देणी थकविल्याबद्दल साखर आयुक्तालयाने मालमत्ता जप्तीची नोटीस काढली आहे. गेल्यावर्षी सुद्धा अशाच प्रकारची नोटीस या कारखान्याला बजावली होती.
४७१ कोटींचे कर्ज सुद्धा भीमा कारखान्याने उचलले आहे.त्या कर्जाच्या व्याजाचे काय ?हा प्रश्न सुद्धा आहे. आपल्या भ्रष्ट कारभाराने महाडिकानी भीमा कारखाना मोडीत काढला आहे.
स्वतः कर्तृत्वशून्य असताना दुसऱ्याची मापे काढण्याचा उद्योग खा. महाडिक यांनी बंद करावा, असेही पत्रकात म्हटले आहे.





