डॉ. डी वाय पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक क्रांती घडवून आणणारा ज्ञान सूर्य आज मावळला आहे. डी वाय दादांनी देशभरातील विद्यार्थ्यांना इंजिनियर्स, डॉक्टर्स तयार करण्याचा ध्यास घेतला होता. सर्वसामान्यांच्या मुलांना प्राथमिक, माध्यमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच उच्च शिक्षणाची द्वारेही दादांनी खुली केली. प्रचंड मोठा शैक्षणिक विस्तार केल्यानंतर सुद्धा दादांनी आपल्या सर्व शैक्षणिक संस्था अतिशय कौशल्याने हाताळल्या. उत्तम प्रशासन, शैक्षणिक संस्थांचा दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता सर्वोत्तम राहिली पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता. आज देशाच्या विविध क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने योगदान देणारे हजारो अभियंते, डॉक्टर्स हे दादांनी तयार केलेल्या विद्यापीठातून तयार झाले आहेत.
राजकारण हा त्यांचा छंद होता परंतु ते राजकारणात फारसे रमले नाहीत. राजकारणाच्या क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी उभे आयुष्य शैक्षणिक क्षेत्राला वाहून घेतले. दादांना अध्यात्माची आवड होती. अनेक ग्रंथांचे वाचन करून त्यांनी एक अध्यात्मिक शक्ती प्राप्त केली होती. माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्यापासून देशभरातील मान्यवर नेत्यांशी डी वाय पाटील यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते.
– खासदार शाहू छत्रपती




