शालार्थ ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ द्या; ऑगस्टमध्ये वेतन रोखू नका : राजेंद्र कोरे
कोल्हापूर, प्रतिनिधी : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शालार्थ वेतन प्रणालीअंतर्गत सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेस 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी तसेच ऑगस्ट महिन्यात कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदन शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑगस्टअखेर शालार्थ प्रणालीमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात ई-केवायसी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने मोठ्या प्रमाणात कर्मचारी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करू शकत नाहीत.
संघटनेने निदर्शनास आणून दिलेल्या प्रमुख अडचणींमध्ये आधार कार्ड व शालार्थमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये तफावत, नवीन नियुक्त शिक्षणसेवकांच्या लग्नापूर्वी व लग्नानंतरच्या नावातील बदल, आधार व शालार्थमधील जन्मतारखेतील विसंगती, काही कर्मचाऱ्यांचे आधार अद्ययावत नसणे तसेच शालार्थमधील नाव दुरुस्तीसाठी शिक्षणाधिकारी किंवा प्रशासनाधिकारी यांच्या मंजुरीस लागणारा कालावधी यांचा समावेश आहे.
या सर्व बाबींचा विचार करून ऑगस्ट महिन्यात कोणत्याही शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रोखू नये आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी संघटनेने केली आहे. यामुळे तांत्रिक अडचणी दूर करून सर्व कर्मचाऱ्यांना प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करता येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्यसेवा राजेंद्र कोरे,, राज्य सल्लागार एम.डी. पाटील जिल्हा कार्याध्यक्ष धीरज पारधी,करवीर तालुकाध्यक्ष राज मेघे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते




