संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे : विवेकानंद परिवाराच्या माऊली
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पाठीमागे सतत सावलीसारख्या राहिलेल्या व बापूजींच्या कर्तृत्वात सिंहाचा वाटा असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या ‘संस्था माऊली’, संस्थेच्या संस्थापक डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पत्नी सुशीलादेवी साळुंखे.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्ञानाची गंगा बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या कळवळ्ळ्यापोटी महाराष्ट्राच्या विशेषतः दुर्गम खेड्यापाड्यात, वाड्या-वस्त्यांत नेऊन पोहोचविणारे संकल्पक संस्थापक गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे तथा शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्याशी १५ डिसेंबर १९४० रोजी बेळगावच्या माळावरील हनुमान मंदिरात अगदी साधेपणाने वैदिक विवाह पध्दतीने झाला.
शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवारांनी पुढाकार घेऊन हा विवाह घडला. वधू-वर यांनी एकमेकांना न पाहता हे लग्न घडले, ‘अक्षता टाकायच्या नाहीत. ते तांदूळ गोरगरीब शिकणाऱ्या मुलांची भूक भागवतील.’ या बापूजींच्या मंगलआष्टकातून सुशीलादेवीचा संसार सुरू झाला आणि पुढे जगात नावलौकिक मिळविलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा आज शेवटचा श्वास सोडेपर्यंत संसार सांभाळला.
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात म. गांधीच्या हाकेला ओ देऊन बापूजी आणि संस्था माऊली भूमिगत झाले, कोल्हापूर, शहापूर-बेळगाव, पडळ-वाळवा असे विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन फिरत राहिले. अरुणा आणि अभयकुमार यांच्यासारखीच आईची माया बोर्डिंगच्या मुलांवर केली. बोर्डिगच्या मुलांच्या जखमा, धुताना स्वच्छतेचा सुसंस्कार देत राहिल्या. डॉ. शरद आणि डॉ दिपक यांच्या अभ्यासाबरोबर न चुकता गोरगरीबांच्या मुलांचा अभ्यास त्यांनी कधी चुकविला नाही.
१९५४ नंतर डॉ. बापूजींनी आणि सुशीलादेवी यांनी संस्था काढण्याचा ध्यास घेतला. १९ ऑक्टोबर १९५४ मध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा पाया घातला गेला. अथक प्रयत्नातून संस्थेच्या ३५३ संस्कार केंद्रांमध्ये महाराष्ट्रात आणि कर्नाटक सीमा भागात विस्तार झाला. शिक्षणात पावित्र्याचा शुद्ध आचाराचा, सद्वर्तनाचा, शील संपन्नतेचा त्यांचा आग्रह होता. महात्मा फुले यांचा वारसा डॉ. बापूजी साळुंखे यांनी ८ ऑगस्ट १९८७ महानिर्वाण होईपर्यंत चालविला. सुशीलादेवी साळुंखे अनंत दुःख अनंत कष्ट सहन करत गरीब, उपेक्षित, बहुजनांच्या शिक्षण प्रसार ते उच्च गुणवत्ता विकासासाठी सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या चंदनाप्रमाणे झिजल्या. त्यांच्या वृत्तीमध्ये आभाळाएवढी माया, सर्वाप्रति वात्सल्य आणि रक्तामध्ये लोकसेवा ही भिनलेली होती. ज्ञान, विज्ञान, सुसंस्कार याखेरीज समाजाचा उद्धार नाही. ‘हरे राम, हरे कृष्ण’ जय बापूजी, हे शब्द उच्चारताच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने शिक्षणार्थ समर्पित झाले. स्वतः वितळून, जळून, दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्ञानमाऊली आता आपल्यात नाही. आपलीच आई आता राहिली नाही, ही वेदना अत्यंत दुःखद आहे. ‘चंदनाचे खोड लाजे ही झिजे त्याहूनही संस्था माऊली’
– प्रा. अशोक पाटील, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर



