मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते अभियानात कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात नंबर वन ठरेल
मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
अक्षय तृतीयेनिमित्त वंदूर- आप्पाचीवाडी पानंदीच्या मजबुतीकरणाचा शुभारंभ
*मतदार संघातील सर्वच पानंद व शेत रस्ते करण्यासाठी प्रयत्नशील *
वंदूर, दि. १९:
कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील सर्वच पानंद आणि शेत रस्ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री बळीराजा अभियानांतर्गत पानंद/शेत रस्ते करण्यामध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघ सबंध राज्यात नंबर वन ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. शेत- शिवारातील रस्ते व पाणंदींच्या मजबुतीकरणामुळे शेतकऱ्यांच्या हाल-अपेष्टा संपतील, असेही ते म्हणाले.
अक्षय तृतीया सणाच्या शुभ मुहूर्तावर “मुख्यमंत्री बळीराजा पानंद / शेत रस्ते अभियाना” चा राज्यातील पहिल्या पानंदीचा प्रारंभ वंदूर ता. कागल येथील शिवारातील वंदूर- आप्पाचीवाडी पानंदीच्या मजबुतीकरणाने झाला.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, सी. एस. आर. सह १५ वा वित्त आयोग, खासदार व आमदार यांचा स्थानिक विकास निधी, ग्रामपंचायतींना जन सुविधांकरीता मिळणारे अनुदान, मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांकरीता मिळणारे अनुदान, जिल्हास्तरीय खनिज विकास निधी, ग्रामपंचायतींना मिळणारे महसुली अनुदान, ग्रामपंचायतींचे स्व- उत्पन्न, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून उपलब्ध होणारा निधी, ग्रामीण भागात गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे म्हणजेच 25:15, इतर जिल्हा योजना, अनुसूचित व आदिवासी क्षेत्रासाठी पेसा अंतर्गत उपलब्ध निधी, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम, भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, आदिवासींसाठी नाविन्यपूर्ण योजना आधी योजनांमधून या अभियानासाठी निधी खर्च करता येतो.
शेतकऱ्यांच्या हाल-अपेष्टा संपणार…….!
श्री. मुश्रीफ म्हणाले, शेत-शिवारातील पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील जीवनमार्ग आहेत. शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे, वैरण व दूध वाहतूक, तसेच बी-बियाणे, खतांची ने-आण आणि काढणी केलेली पिके घरी आणण्यासाठी मजबूत पानंद रस्त्यांची सक्षम पायाभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण ही काळाची गरज असून या योजनेमुळे ग्रामीण भागातील वाहतूक सुलभ होणार आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी मी दरवर्षी माझ्या आमदार फंडातून नियमित निधी देईन.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कागल पंचायत समितीच्या सभापती सौ. सुवर्णा पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुवर्णा कांबळे, बाजार समितीचे संचालक बी. जी. पाटील, प्रांताधिकारी प्रमोद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, भूमी अभिलेख अधिकारी सौरभ तुपकर, वंदूरच्या सरपंच सौ. धनश्रीदेवी घाटगे, बबन खोडवे, शिवसिंह घाटगे, पारीसा जंगटे, बाबुराव हंचनाळे, उत्तम कांबळे, बाबुराव बागणे, आनंदा काळुगडे, ऋतुराज घाटगे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
………..
वंदूर- अक्षय तृतीया सणानिमित्त “मुख्यमंत्री बळीराजा पानंद / शेत रस्ते अभियाना” चा प्रारंभ वंदूर- आप्पाचीवाडी या पानंदीच्या मजबुती करणाच्या कामाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रताप उर्फ भैया माने, सौ. सुवर्णा पाटील, सौ. सुवर्णा कांबळे, सरपंच सौ. धनश्रीदेवी घाटगे बी. जी. पाटील आदी प्रमुख.




