गोरगरीब सामान्य माणसांपर्यंत प्रशासन पोहोचावे हीच अपेक्षा
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
कागल तालुक्याचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर बामणी येथे संपन्न
१७,५०७ लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या मंजुरीपत्रांचे वाटप
बामणी, दि. ३१:
महाराष्ट्र राज्य सरकारच्या नागरिकांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजना घेऊन प्रशासन सामान्य माणसांपर्यंत पोहोचावे हीच सरकारची अपेक्षा असते. अशा अभियानामधून ही अपेक्षा पूर्ण होत असते, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. अशा अभियानांमधून महाराष्ट्र राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचतात, असेही ते म्हणाले.
कागल तालुक्यासाठीच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” चे आयोजन बामणी ता. कागल येथील आर. के. सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित केले होते. महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती यानिमित्त या शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजयबाबा घाटगे, जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड, शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य अमरीशसिंह घाटगे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, केशरी शिधापत्रिकाधारकांना अजूनही तांदूळ, गहू मोफत मिळत नाहीत. अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घालून ही सुविधा नागरिकांना मिळवून द्यावी. लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत देऊनही काही माता-भगिनींनी मुदतीत पूर्तता न केल्यामुळे त्या योजनेबाहेर राहिल्या आहेत. ही बाब मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस व मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देऊ. योजनेबाहेर राहिलेल्या माता-भगिनींना अजून एक शेवटची मुदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेबद्दल मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद आणि अभिनंदनही. कारण; लोकसभेच्या निवडणुका अजून तीन वर्षे आणि विधानसभेच्या निवडणुका अजून साडेतीन वर्षे पुढे आहेत. कोणतीही निवडणूक तोंडावर नसतानाही केवळ शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या भावनेनेच महाराष्ट्र राज्य सरकारने ६४ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही नागरिकांचे वीज बिल शून्यावर आणणारी आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करूया. यामुळे कागल तालुक्याची नोंद स्वतः पंतप्रधान श्री. मोदी, मुख्यमंत्री श्री. फडणवीस घेतील व तालुक्याचा गौरव देशपातळीवर वाढेल.
शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस विधायक उपक्रमातून साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यास दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीची जोड देऊन राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानास मिळाले़ला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ते यशस्वी झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे नेतृत्वाखालील महायुती सरकारने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी व वीज बिल माफी करून अडचणीत असलेल्या शेतक-यांना दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अनेक लोक कल्याणकारी योजना अशा शिबिरातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यांना थेट लाभ मिळत आहे.
गोकुळ चे माजी संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज महारास्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या.पाणंद रस्त्यांचा पाया मंत्री मुश्रीफांनीच घातला आहे. दूध संकलनात कागल तालुका सर्वात मोठा आहे. कर्जमाफी व वीज बील माफी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे आभार मानले.
जिल्हाधिकारी विजय राठोड म्हणाले की, नागरिकांना शासनाच्या विविध सेवा एकाच छताखाली आणि अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘शासन आपल्या दारी’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळून त्यांच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करणे शक्य होत आहे.
तसेच, यावेळी त्यांनी शासनाच्या विविध नाविन्यपूर्ण योजनांची सविस्तर माहिती दिली. नागरिकांनी या लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी विशेषतः सोलर रूफटॉप योजनेचा लाभ घेण्याबाबत नागरिकांना प्रवृत्त केले. या योजनेमुळे नागरिकांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
*भेट शरद पवार साहेबांची……!*
श्री. मुश्रीफ म्हणाले, दोनच दिवसांपूर्वी पार्थ पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो. तिथे ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब उपस्थित होते. त्यांनी मला बोलावून घेतले आणि ऊस तंत्रज्ञानातील कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI च्या वापराविषयी व उत्पन्न वाढीविषयी चर्चा केली. या निमित्ताने श्री. पवार साहेबांशी अनेक वर्षांनंतर बोलणे झाले, असेही श्री मुश्रीफ म्हणाले.
यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, कागल पंचायत समितीच्या सभापती सौ. सुवर्णा पाटील, उपसभापती इंद्रजीत पाटील, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुयशा घाटगे, सौ. शिवानीताई भोसले, जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावडकर, कागल नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. सविता माने, सौ. धनश्रीदेवी घाटगे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय दंडवते, अनिलकुमार हेगडे, दिगंबर अस्वले, रूपाली आंगज, तेजस्विनी भोरे, मनिषा पाटील, बाबासाहेब सांगले, गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे, नेताजी मोरे आदीप्रमुख उपस्थित होते.
…………
*कागल तालुक्याच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन बामणी ता. कागल येथील आर. के. सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित केले होते. या शिबिरात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे, जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड, शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य अमरीशसिंह घाटगे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे आदी प्रमुखांच्या हस्ते झाले.*
==========




